Social Icons

रविवार, ३० डिसेंबर, २०१२

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
सर्वजन कल्याणकारी पहिली भारतीय महिला राज्यकर्त्या
भारतात ख-या अर्थाने समाज सुधारकांची चळवळ इंग्रजांच्‍या राज्यात महात्‍मा फुले यांनी सुरु केली. हाच आदर्श घेवुन छत्रपती शाहू महाराजांनी राजे असुनही समाज सुधारकाचे काम केले. सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामास्‍वामी, नारायणगुरु, अण्‍णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाज सुधारकाचे काम केले. त्‍यापूर्वी धर्माची सुत्रे ठराविक लोकांच्‍याच हातात होती. भारतीय स्‍त्री तर कोणत्‍याही जाती धर्माची असली तरी तिला शुद्र म्‍हणूनच वागणूक मिळत होती. पतीबरोबर सती जाणे पुण्‍य आहे अशी बंधने तिच्‍यावर घालण्यात आली होती. महाराष्‍ट्रात हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या नावाखाली पेशव्‍यांनी धुमाकुळ घातला होता. अशा काळात थोर क्रांतीकारी सामाजिक राज्‍यकर्त्‍या पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर होऊन गेल्‍या. 


 महाराणी अहिल्याबाई होळकर या भारतातील पहिल्या क्रांतीकारी समाजसुधारक महिला राज्यकर्त्या ठरतात. अहिल्‍याबाईचा जन्‍म 31 में 1725 रोजी अहमदनगर जिल्‍ह्यातील चौंडी या गावी झाला. शिवरायांच्या हिंदवी स्‍वराज्‍याचा झेंडा अटकेपार लावणारे आणि मध्‍य प्रदेशात हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करणारे मल्‍हाररावजी होळकर हे अहिल्‍याबाईंचे सासरे होते. त्‍यांनी प्रजेच्‍या हिताचे, सुख्‍ शांतीचे राज्य निर्माण केले. राजाचा वारस पुत्र खंडेरावाचा लढाईत मृत्‍यू झाला. रुढी परंपरेने सती जाण्‍याची वेळ अहिल्‍याबाईवर आली. परंतु जनतेसाठी निर्मा्ण केलेले राज्‍य पेशव्‍याच्‍या हातात जाऊन प्रजेला त्रास होईल म्‍हणून पाखंडी धर्माच्‍या श्रृखंला तोडून अहिल्‍याबाईला सती न जाऊ देता तिच्या हाती राज्‍यकारभार सोपविण्‍याचे काम मल्‍हाररावांनी केले. अहिल्‍याबाईने सती जाण्‍याचा रुढी रिवाज तोडून, लोक निंदेला न जुमानता, आपण मेलो तर आपल्‍याला सुख मिळेल, परंतु जगलो तर आपल्‍या लाखो प्रजाजनांना सुख मिळेल म्‍हणून सती न जाण्‍याचे ठरवून धर्माच्‍या विरुध्‍द क्रांतीकारी पहिले बंड केले. धर्माच्‍या नावाखाली भारतीय स्‍त्रीला शिक्षणाचा, राज्‍य करण्‍याचा अधिकार नव्‍हता. त्‍या विरुध्‍द क्रांतीकारी दुसरे बंड करुन अहिल्‍याबाईने राज्‍य कारभाराची सूत्रे हाती घेतली. कुटूंबातील सासरा, नवरा, मुलगा या सर्वांच्‍या मृत्‍यूनंतर जनकल्‍याणासाठी मनोधैर्य खचू न देता, धैर्याने अहिल्‍याबाईंनी राज्‍यकारभार संभाळला. त्या जास्‍तीत जास्‍त वेळ समाज कल्‍याणासाठी देत. अहिल्‍याबाईंनी प्रजेला त्रास देणा-यांना पकडून आणून सामोपचाराच्‍या गोष्‍टी सांगून त्‍यांना जगण्‍यासाठी जमिनी देवून चांगल्‍या मार्गाला लावले. त्‍यांचे संसार सुखा समाधानाने फुलविले. प्रजेचा छळ न करता प्रजेला परवडेल एवढाच कर वसूल केला. करा पासून वसुल केलेला पैसा लोकांच्‍याच हिताकरिता खर्च केला. धन संपत्‍ती ही व्यक्तिगत मालमत्ता नसुन देवाने आणि जनतेने योग्य रितीने विनियोग करण्याकरिता आपल्‍या स्‍वाधीन केलेला तो एक ठेवा आहे, असे त्‍या समजत. वारस नसेल तर दत्‍तक घेण्‍याचा व स्‍वाभिमानाने जगण्‍याचा अधिकार अहिल्‍याबाईंनी प्रजेला दिला होता. प्रजेचे सुख-दुःख स्‍वतः प्रत्‍यक्ष ऐकून घेऊन भेटण्‍यासाठी प्रजेला वेळ देत आणि स्‍वतः न्‍यायाधिशाप्रमाणे काम करीत. अहिल्‍याबाईंच्‍या राज्‍यात जातीभेदाला थारा नव्‍हता. त्‍या सर्व प्रजा सारखीच मानीत असत. याचा परिणाम असा होइ की पुष्‍कळ वेळा निजामशाही, पेशवाई सारख्‍या राज्‍यातील लोकसुध्‍दा, "आम्‍ही तुमच्‍या राज्‍यात राहायला येतो" असे त्‍यांना म्‍हणत. एकंदरीत अहिल्‍याबाईंची प्रजा संतुष्‍ट व सुखी होती. कारण प्रजेचा संतोष हाच राज्‍याचा पाया आहे, असा अहिल्‍याबाईंचा विचार होता. प्रजेचा सांभाळ लेकरा प्रमाणे करणे, हा राजधर्म असलयाचे राजमाता अहिल्‍याबाई मानत. राज्‍य कारभारातील कोणत्‍याही अधिका-याने अथवा जवळच्‍या माणसाने प्रजेकडून पैसे उकळले तर अहिल्‍याबाई त्‍याला ताबडतोब शिक्षा करीत आणि त्‍याचे अधिकार काढून घेत. त्यांचा प्रशासनावर वचक होता. सर्व जनतेला न्‍याय मिळावा म्‍हणून न्‍यायालयाची स्‍थापना, गावागावात पंचायतीची स्‍थापना, न्‍याय मिळविण्‍यासाठी आर्जव करण्‍याची व्‍यवस्‍था, प्रत्‍यक्ष राजाला भेटून न्‍याय मिळविण्‍याची व्‍यवस्‍था, पोलीस यंत्रणा, गावोगाव कोतवालाची पदे निर्मीती, तसेच कृषी आणि वाणिज्‍य या क्षेत्राच्या उत्‍कर्षावर जास्‍त भर देऊन शेतक-यांना न्‍याय मिळवून देण्‍यात आला होता. प्रजेसाठी, रस्‍ते, पुल, घाट, धर्मशाळा, विहीरी, तलाव बांधले होते. बेरोजगारांना रोजगार मिळण्‍यासाठी रोजगार धंद्याची योजना राबविण्‍यात आली होती. रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी वृक्षरोपण केले होते. भाविक गोर-गरीब लोक तीर्थ्‍ यात्रेला जात असत व तेथे त्‍यांची गैरसोय होऊ नये म्‍हणून अन्‍नदानाची छत्रे, राहाण्‍यासाठी धर्मशाळेची सोय, हे फक्‍त होळकरांच्‍या राज्‍यातच नव्‍हे तर संपूर्ण भारतातील इतर राज्‍यात सुध्‍दा प्रत्‍येक तीर्थयात्रेच्‍या ठिकाणी सोयी महाराणी अहिल्‍याबाईंनी उपलब्‍ध केल्या होत्या.

अहिल्‍याबाईंनी शत्रूंचा - बंडवाले समाज कंटकांचा बिमोड करुन त्‍यांचे पुनर्वसन केले आणि राज्‍यात शांतता प्रस्‍थ‍ापित केली. राज्‍य कारभार, समाज व्‍यवस्‍था, कायदे कानून वगैरे बाबत सुधारणा केल्‍या. त्‍यामुळे प्रजा अहिल्‍याबाईंच्‍या सामाजिक, राजकीय कार्यावर संतुष्‍ट होती. अहिल्‍याबाईचे राजकारण्‍ एकंदरीत शांततेचे होते. त्‍यामुळे राज्‍यात शांतता व सुबत्‍ता लाभली. याची नोंद पंडीत नेहरुनी देखील घेतली आहे. म्‍हणूनच त्‍यांना शांतताप्रिय राज्यकर्ती असे म्‍हणतात. अहिल्‍याबाईने इ.स. 1765 ते 1795 या प्रदीर्घ कालावधीत राज्‍य केले. 13 ऑगस्‍ट 1795 रोजी लोकमाता अहिल्‍याबाईंचा मृत्‍यू झाला. अहिल्‍याबाईंच्‍या राज्‍य कारभाराबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल मराठी, उर्दु, इंग्रजी कवी, लेखकांनी फार मोठ्या प्रमाणात साहित्‍य लिहून ठेवलेले आहे. पेशवाई आणि इतर राज्याची तुलना केली तर त्‍या काळात अहिल्‍याबाई फार मोठ्या सामाजिक, क्रांतीकारक राज्‍यकर्त्‍या होऊन गेल्‍या. हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्त सत्‍य समोर येते. स्‍वातंत्र्यानंतर 45 वर्षात लोकशाही प्रशासनाच्‍या योजनेत जे अनेक कलमी कार्यक्रम राबविले जात आहेत, ते सर्व लोकमातेच्‍या राज्‍यात राबविण्‍यात आलेले दिसून येते. अहिल्‍याबाईंचा प्रशासनावर फार मोठा वचक असल्‍यामुळेच त्‍या समाजाला न्‍याय देऊ शकल्‍या. धार्मिक,सामाजिक, आर्थिक, सांस्‍कृतिक आघाडीवर महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांनी तब्‍बल 30 वर्षे समर्थपणे राबविलेल्‍या शासन यंत्रणेतून क्रांतीकारक कार्य केले. यातून राजमातेची शक्‍ती आणि युक्‍ती दिसून येते. त्‍या केवळ धनगर समाजाच्‍याच नव्‍हे तर तमाम भारतीय जनतेच्या आदर्श ठरतात. लोकमातेच्‍या धार्मिक, सांस्‍कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि मुख्‍यत्‍व राजकीय प्रेरणा स्‍त्रोतातून किमान एक पैलू - पकडून - प्रेरणा घेऊन धनगर तसेच राष्ट्रीय समाजाने वाटचाल केली असती तर भारत- भारतीय समाज आज एक मागास - दुबळा देश-समाज म्‍हणून ओळखला गेला नसता. सम्राट चंद्रगुप्‍त मौर्यापासून ते होळकरांपर्यंत वैभवशाली व कल्‍याणकारी परंपरा असताना धनगर समाज पर्याप्त शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, राजकीय भागीदारी पासुन वंचीत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

 
For More Details About this Blog
Mo. no. +91 8055373718
Mail- kedarsmoto@gmail.com
Mitra Blogging Services, Ahmednagar